

Hit and Run Bhandara
भंडारा : भरधाव पिकअप वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एकाला उडवले. यात वरठी येथील गांधी वार्ड निवासी दीपक मुरलीधर तिवाडे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २२) पहाटे 5. 20 च्या दरम्यान सॅनफ्लॅग कंपनी समोरील राज्य महामार्गावर घडली. वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला असून परिसरातील सीसीटीव्ही आधारावरून त्या वाहनाच्या शोधात वरठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत.
मृतक दीपक हे सॅनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशी ते पहाटे पत्नीसह सकाळी फिरायला निघाले. घरापासून 200 मीटर अंतरावरील राज्य महामार्गावरील रस्त्यापासून दूर अंतरावर चालत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. यात दीपक यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात त्यांची पत्नी थोडक्यात बचावली. धडकेचा आवाज एकटाच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान मोठा भाऊ नरेश व सोहम यांनी घटनास्थळ गाठून त्यांना शासकीय दवाखाना भंडारा येथे हलवले. डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून वरठी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक निलेश यांच्या मार्गदर्शनात हवालदार धामेश्वर खराबे, प्रेम डोरले, आदित्य इलंमकर तपास करीत आहेत.
दिपकच्या अकाली मृत्यूने कुटुंबात संकट कोसळले असून ते एकमेव कमावता होते. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगी व मुलगा असून ते मुलगी अकरावी व मुलगा सातव्या वर्गात शिकत आहेत.