अमरावती, पुढारी वृत्तसेवा
अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह अचलपूर, अंजनगाव सुर्जी आणि भातकुली तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के आज (सोमवार) (सप्टेंबर ३०) जाणवले. दुपारी एक वाजून 37 मिनिटांनी काही भागात भूकंपाच्या सौम्य धक्क्याने जमीन हादरली. (Earthquake)
नॅशनल सेंटर ऑफ सेस्मोलॉजी या संकेतस्थळावरुन प्राप्त माहितीनुसार, आज (सोमवार) 30 सप्टेंबर रोजी दु.1.37 वा. दरम्यान अमरावती व अकोला जिल्हयामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सदर भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात अमझरी व टेटु या गावाच्या दरम्यान आहे. रिश्टर स्केलवर याची नोंद 4.2 इतकी नोंदवली गेली आहे.
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ चुरणी येथे जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यासह भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू, जळका हिरापूर, पूर्णा नगर आदी ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले. अंजनगाव सुर्जी शहरातील माळीपुरा, पाच पावली, बुधवार पेठ, शनिवार पेठ, पान अटाई, सावकारपुरा, बालाजी नगर, काठीपुरा भागात देखील भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
अमरावती जिल्हा प्रशासनाने अद्याप या संदर्भात माहिती जाहीर केलेली नाही. मात्र 4.2 रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. अमरावती शहरातील बुधवार परिसरातही नागरिकांना भूकंप जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान भूकंपांच्या सौम्य धक्क्यामुळे अद्याप जीवित किंवा वित्तहानी झाल्याची घटना जिल्ह्यात कुठेही झालेली नाही.