

अमरावती : जिल्ह्यातील टाकरखेडा संभू येथे स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असतानाच अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने 35 ते 40 नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.30)दुपारी 2.30 वाजताच्या सूमारास घडली. यातील काहींवर वलगाव आणि अमरावतीमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की गावातील मोहन लक्ष्मण टवलारे (वय 55) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे दुपारी त्यांच्या अत्यंविधीला गावातील तसेच बाहेरगावातील नागरिक हजर झाले होते. येथील अंबराई स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक मधमाशांनी हल्ला चढविला. त्यामुळे अंत्यंविधी मध्येच सोडून नारिकांनी पळ काढला. अचानक झालेल्या मधमाशांच्या या हल्ल्यामुळे नागरिक सैरावैरा झाले. काहींनी नजिकच्या तुरीच्या शेतात आडोसा घेतला.त्यामुळे ते बचावले.
काही वेळानंतर पुन्हा अंत्यविधी पूर्ण करण्यात आला. मात्र तोपर्यंत या हल्ल्यात 35 ते 40 जण जखमी झाले होते. काहींनी गावातील डॉक्टरकडे धाव घेतली तर काही जण तातडीने वलगाव, अमरावती येथील खासगी रूग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात मुरलीधर वानखडे (कवठा), सचिन गणोरकर (अकोट), टाकरखेडा संभु येथील सुरेंद्र देशमुख, देवानंद टवलारे, सुधीर टवलारे, राजू निमकर, अनिकेत वानखडे, सुरज कांडलकर, गोपाल देशमुख, बाबू येवतकर, प्रवीण पाटील, वृषभ टवलारे यांच्यासह 35 ते 40 जण जखमी आहेत.