

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (डीजीसीए) एअरोड्रोम परवाना गुरूवारी (दि.13) मिळाला आहे. यामुळे गेले अनेक वर्षांचे हवाई वाहतुकीचे अमरावतीकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेले अमरावती येथील बेलोरा विमानतळ आता जवळपास तयार झाले असून लवकरच या विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होण्याची शक्यता आहे. नुकतीच या विमानतळावर एअर कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर अर्थात पीएपीआय चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आता गुरूवारी (दि.13)अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी DGCA कडून हिरवी झेंडी मिळालेली आहे. आता लवकरच नियमित विमान उड्डाण सुरू होईल. अमरावती विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याअनुषंगाने या भागात उद्योग, रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीकरांच्या स्वप्नाला पंख भरारीचे लागले!, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी या विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले व या क्षणाची उत्कटतेने वाट बघणाऱ्या अमरावतीकरांचे पालकमंत्री म्हणून मी मनपूर्वक अभिनंदन करतो,असे ते म्हणाले. अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी परवाना मिळाल्याने आता येथून लवकरच जगभरात उड्डाण सुरू होतील. मार्च 2025 च्या अखेरीस विमान वाहतूक सुरू होणार आहे.