अमरावती : जिल्ह्यातील भातकुली ते दर्यापूर मार्गावरील सायत गावाजवळ बुधवारी (दि.२८) रात्री भीषण अपघात झाला. आयटेन आणि होंडा सिटी या दोन भरधाव कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे.
अधिक माहितीनुसार, बुधवारी २८ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सायत हे गाव भातकुली ते दर्यापूर मार्गावर असून आयटेन व होंडा सिटी या दोन कार भरधाव वेगामध्ये समोरासमोर धडकल्या. या भीषण धडकेमध्ये दोन्ही कारमधील चार जण मृत्युमुखी पडले. घटनास्थळी भातकुलीचे ठाणेदार राजू राजुलवार व त्यांचे पथक पोहोचले असून गंभीर जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान अद्यापपर्यंत मृतकांची ओळख पटलेली नाही. दोन्ही कारचा वेग इतका प्रचंड होता की, धडक होताच गाड्यांचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच भातकुलीचे ठाणेदार राजू राजुलवार आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) उपचारासाठी हलवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मृतकांची ओळख पटलेली नव्हती. पोलीस सध्या दोन्ही वाहनांच्या क्रमांकावरून मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.या अपघातात अमरावती शहरातील एका सुप्रसिद्ध मिठाई व्यावसायिकासह दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने शहरात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर रात्रीच्या वेळेत घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजू राजुलवार यांच्यासह वलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.