अमरावती : टिटवा ते धारणी मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील दोन बालकांसह चौघांचा मृत्यू

अमरावती : टिटवा ते धारणी मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील दोन बालकांसह चौघांचा मृत्यू
अमरावती; पुढारी वृत्तसेवा : होळीचा दिवस अतिदुर्गम भाग असलेल्या मेळघाटवासियांसाठी काळा रविवार ठरला आहे. एकीकडे दुपारी राज्य परिवहनची बस दरीत कोसळून दोन महिलांसह एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान पुन्हा एक अपघात झाला आहे. टिटवा ते धारणी मार्गावर एका भरधाव कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे ठार झाले आहेत. दुचाकीवरील पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. संबंधित कुटुंब हे होळी सणा निमित्त बाजारात खरेदी करण्यासाठी धारणी येथे गेले होते. तेथून परत धोतरा येथे येत असताना हा अपघात झाला. अपघातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेळघाटात होळीचा सण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या सणाच्या अनुषंगानेच धोतरा येथील पती-पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह धारणी-देडतलई येथील बाजारातील खरेदी करून घरी परत जात होते. दरम्यान धारणी पासून जवळच असलेल्या घुटी गावानजीक टीटंबाकडून येणाऱ्या भरधाव कार क्रमांक एम एच 29 ए आर 14 56 च्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दादू दारसिंबे (२८) व त्याची पत्नी शारदा दादू दारसिंबे (२४) तसेच त्यांची दोन अल्पवयीन मुले गंभीर इजा झाल्याने घटनास्थळीच ठार झाले. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घटनास्थळी पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. अपघातास कारणीभूत असलेला कार चालक मारुती अतुल रामलाल कासदेकर (रा.शिरपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news