अकोला : धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला, तरीही तो पडू शकत नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेला, असा संशय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी अकोल्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, जुन्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावात बसवले गेले. त्यावेळी ते नुसते चबुतऱ्यावर बसवले गेलेत; मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही.
पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्या आहेत. मात्र, पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय, असे आंबेडकर म्हणाले.