Yashomati Thakur: राज्यातील सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करत आहेत : यशोमती ठाकूर
अमरावती, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करत आहेत. पोलिसांची भीती राहिली नाही. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी आज (दि. ९) अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून व्यक्त केली. Yashomati Thakur
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो. मात्र, आज लोकप्रतिनिधींद्वारे किंवा लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या अशा गोळीबार प्रकरणामुळे पोलिसांची भीती राहिली नाही, असे दिसून येत आहे. नागपूर मध्ये क्राईम रेट वाढला आहे. पुण्यामध्ये कोयता गँगची भीती आहे, असे आमदार ठाकूर म्हणाल्या.Yashomati Thakur
सगळे गोळीबार करणारे आपले बॉस हे सागर आणि वर्षावर राहत असल्याचे सांगून आमचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, असे म्हणत आहेत, असा आरोपही ठाकूर यांनी केला. महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचे पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचे चारित्र्य सांभाळता येत नसेल. तर नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.
हेही वाचा