नागपूर : १४ सप्टेंबरपर्यंत तलाठी परीक्षेसाठी १४४ कलम लागू
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गोंधळानंतर महसूल व वन विभाग यांचेकडून आयोजित गट- क संवर्गातील तलाठी भरती परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम१४४ नुसार निर्बंध लावण्यात आले आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षा द्याव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. १४ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे
नागपूर जिल्हयाच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, तसेच या परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता परीक्षा केंद्राच्या परिसर व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ नुसार निर्बंध लागू करुन सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी, बुथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर्स, ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाईल, प्रसारमाध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांनी केवळ परीक्षवर लक्ष ठेवावे, कोणत्याही अफवा, व्यक्तीवर विश्वास ठेऊ नये. राज्य शासनाच्या गृह व अन्य सर्व यंत्रणा, परीक्षेच्या पारदर्शीतेवर लक्ष ठेऊन असल्याचेही स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील परीक्षा केंद्राच्या परीसरात व त्यासभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचारी वगळून इतर कोणत्याही खाजगी व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यास मनाई असेल. तसेच परीक्षा केंद्राचे परीसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. हा आदेश संबंधीत केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी/सुरक्षा अधिकारी यांना लागू होणार नाही.
परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेससेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप व तत्सम इतर साधने जवळ बाळगण्यास व परिसराच्या १०० मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई आहे. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.