चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : रात्री कर्तव्यावर असताना भोवळ आलेल्या एका परिचारीकेला उपचाराअभावी जिव गमवावा लागल्याची घटना चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आली आहे. परिचारिका सीमा मेश्राम असे मृतक परिचारीकेचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १९) आरोग्य कर्मचारी व परिचारीकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याकरिता आंदोलन केले. या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात १६ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसूती वॉर्डात रात्री परिचारीका सिमा मेश्राम ह्या ड्युटीवर होत्या. रात्रीच्या वेळीच कर्तव्यावर असताना त्यांना भोवळ आली. यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सर्व परिचारिका संघटना, महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती शाखा चंद्रपूर यांचेवतीने परिचारीका सिमा मेश्राम यांना न्याय मिळवून देण्याकरीता शुक्रवारी (दि. १९) आंदोलनाचा मार्ग स्विकारला.
सीमा मेश्राम या एक समर्पित परिचारिका होत्या. रुग्ण सेवेसाठी त्या रुग्णालयात कर्तव्यावर असताना बेशुद्ध पडल्या. विशेष म्हणजे, त्याच रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचेवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात न आल्याने त्याचा तिचा जीव गेला. रात्री सव्वा दोनपासून तर सकाळच्या नऊ वाजेपर्यंत गोल्डन अवर्समध्ये तिच्यावर तपासणी करून निदान करणे आवश्यक असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांचेवर उपचार न झाल्याने जिव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करत आंदोलन पुकारण्यात आले. रुग्णालयातील परिचारिकांनी दुःख व्यक्त करीत डॉक्टरांप्रती संताप व्यक्त करून कार्यवाहीची मागणी केली आहे. परिचारीका सीमा मेश्राम यांचा मृत्यू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने झाल्याने त्यांना मिळण्याकरिता महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती शाखा चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांसह परिचारिका संघटनेने आंदोलन करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका सीमा मेश्राम यांना आपला जीव गमवावा लागला. शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही, हे उघड आहे. मात्र, त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सला उपचाराअभावी जीव गमवावा लागतो, ही घटना दुर्दैवी असून, निष्काळजीपणाचे लक्षण आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.