भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस; गोसीखुर्दचे 31 दरवाजे अर्धा मीटरने उघडले
भंडारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या २४ तासात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवनी तालुक्यातील सोमनाळा बु. ते कोंढा या मार्गावरील पुलावरून एक फुटापर्यंत पाणी वाहू लागले. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक बंद करावी लागली. दुसरीकडे मध्य प्रदेशातील संजय सरोवरच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रविवारी (दि. 16 ) रात्री गेट उघडून 283.17 क्युमेक्स पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर काही ठिकाणी पाणी साचले होते. पावसामुळे आता शेतकऱ्यांना लागवडीची कामे पूर्ण करता येणार आहेत.
जिल्ह्यात यंदा पाऊस उशिराने सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची लावणीची कामे रेंगाळली आहेत. मात्र शनिवार 15 जुलैच्या रात्री आणि रविवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 242.2 मिमी पाऊस झाला आहे. ज्याची सरासरी 42 मि.मी. मी आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचेही दिसून आले. पवनी तालुक्यातील सोमनाळा बु. ते कोंढा रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचले होते. त्याचप्रमाणे शहरातील काही वसाहती आणि नजीकच्या बेला गावामध्येही काही काळ पाणी साचले आहे. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते अतिवृष्टीचा इशारा होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरातून 283.17 क्युमेक्स पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत होणारी वाढ रोखण्यासाठी पूर्व तयारी म्हणून गोसीखुर्द धरणातून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी गोसीखुर्द धरणाचे एकूण 33 पैकी 31 दरवाजे उघडून 3557.48 क्युमेक पाणी सोडण्यात आले. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे संकेत दिले आहेत.