Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, खूप काम केले पण 'हे' मी करू शकलो नाही!
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री म्हणून मी बरेच काम केले मात्र देशातील अपघात अपेक्षेनुसार कमी करू शकलो नाही. या गोष्टीचे मला दु:ख आहे, अशा शब्दात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
जी. एच. रायसोनी मेमोरियल टाॅक अंतर्गत अभिनेता अनुपम खेर यांनी शनिवारी (दि. १) वसंतराव देशपांडे सभागृहात घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेचे दुःख व्यक्त करीत गडकरी पुढे म्हणाले, देशात वर्षाला पाच लाख अपघात होतात. त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. मी अनेक चांगले काम केले, मात्र अपेक्षेनुसार अपघात कमी करू शकलो नाही याची निश्चितच खंत आहे. सरासरी अपघातात १८ ते ३४ वयोगटातील ६० टक्के तरुणांचा मृत्यू होतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा ना कुणाला सन्मान आहे, ना भीती. आपल्या जीवनात पैसे कमावणे गुन्हा नाही. मात्र, जबाबदार संवेदनशील नागरिक होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असेही गडकरी आवर्जून यावेळी अभिनेता अनुपम खेर यांच्याशी संवादात म्हणाले.