![राज्यात नद्यांची स्थिती गंभीर : डॉ राजेंद्र सिंह](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2FNira-River.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह देशातील नद्यांची स्थिती अतिशय वाईट असून या नद्यांना आजार एक असून सरकार दुसऱ्याच आजारांचे औषध देऊन ब्यूटी पार्लरमध्ये उपचाराला पाठवत असल्याचा घणाघाती आरोप जलतज्ज्ञ आणि चला जाणूया नदीला या उपक्रमाचे प्रणेते डॉ राजेंद्र सिंह यांनी आज पत्रपरिषदेत केला.
राजेंद्र सिंह म्हणाले, सध्या नद्या आजारी असून अत्यवस्थ आहेत. नद्यांच्या या स्थितीला सरकार जबाबदार आहे. नदीपात्र परिसरात होणारे अतिक्रमण नदीमध्ये सोडले जाणारे रसायन मिश्रित व दूषित पाणी, वाळूचा अनियंत्रित उपसा, नदी पात्रात साचलेले गाळ व इतरही बरीच कारणे या नद्यांच्या वाईट अवस्थेसाठी जबाबदार आहेत. महाराष्ट्रात सध्या ६० टक्के नद्या पूर्णपणे कोरड्या पडल्या, तर ४० टक्के नद्यांचे रुपांतर नाल्यात झाले आहे. येथे एकाही नदीचे पाणी पात्रातून पिणे सोडा आंघोळीलाही घेता येत नाही. या नद्यांमध्ये गाळ काढणे, नैसर्गिक पद्धतीने दूषित पाणी शुद्धीकरणासह इतरही बरेच उपाय करण्याची गरज आहे. परंतु सरकार वेगळ्याच कामावर कोट्यावधी खर्च करून वेळ वाया घालत आहे. नदीतील दूषित पाण्यामुळे सध्या विविध आजार वाढले असून ही स्थिती आणखी बिघडू शकते. महाराष्ट्रात 'चला जाणूया नदीला' हा उपक्रम सरकार आणि असरकारी लोकांच्या मदतीने सुरू झाला आहे. त्यात १०९ नदींचा अभ्यास होत असून नद्यांची स्थिती सुधारण्यासाठीचे प्रयत्न होणार असल्याचेही राजेंद्र सिंह यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नरेंद्र चुघ, प्रवीण महाजन, डॉ. सुमंत पांडे, रमाकांत कुळकर्णी उपस्थित होते.