Chandrashekhar Bawankule : मविआच्या इना-मिना-डिकाला घरचा रस्ता दाखवायचा; चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

Chandrashekhar Bawankule : मविआच्या इना-मिना-डिकाला घरचा रस्ता दाखवायचा; चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढरी वृत्तसेवा : कोण मोठे, कोण लहान हे भाजप- शिवसेनेत महत्त्वाचे नाही. युतीचे भक्कमपणे सरकार आणत मविआच्या इना-मिना-डिकाला घरचा रस्ता दाखवायचा आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. मोदी-शिंदे यांच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, आमची आपसात स्पर्धा नाही, मला जाहिरातीबद्दल माहिती नाही. ना मी कोणाला बोलण्यापूर्वी विचारले आहे. शिंदे-फडणवीस दोघे एकमेकांना विचारल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. महाविकास आघाडी घरी जाईल, 100 पेक्षा कमी जागा मिळतील. कोणी काय करावे हा त्यांचा विषय आहे, मात्र कुठलाही वाद निर्माण होऊ नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे नेते असतात. कुठलीही भूमिका ही मुख्यमंत्र्यांनाच मांडावी लागते आणि ते आम्ही स्वीकारलेले आहे. या माविकास आघाडीला कसे १०० च्या आत रोखता येईल हेच आमचं एकमेव उद्दिष्ट आहे, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.

पक्षात कोणाला मंत्री बनवायचं हा एकनाथ शिंदेचा अधिकार आहे, यावर त्यांनी पुन्हा एकदा भर दिला. २०१४ आणि २०१९ मध्ये राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे जनतेने स्वीकारले होते. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. राज्याच्या हिताचे लोकप्रिय बजेट देवेंद्र फडणवीस यांनी मांडले, युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. यात देवेंद्र फडणवीस मागे पडले एकनाथ शिंदे पुढे गेले असं काहीही नाही. कुणाला जास्त पसंती आहे असा प्रश्नच उपस्थित होत नाही. शेवटी राज्याच्या जनतेला काय पाहिजे हे अधिक महत्त्वाचे आहे. कोण मागे कोण पुढे हा प्रश्न नाही असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात डबल इंजन सरकारकडून अपेक्षा आहेत. २०२४ मध्ये भाजप-सेना युतीचेच सरकार महाराष्ट्रात येईल. कुणाचेही महत्त्व कुणामुळे कमी होत नाही, शेवटी जनतेचा निर्णय असतो, जनता पसंती ठरवते. महाराष्ट्राच्या जनतेला शिंदे फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. दोघेही जनतेसाठी प्रयत्न करत आहेत. जनता युतीला पसंती देईल. युतीत लहान मोठं कोणी नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यापूर्वी मंत्री असताना चांगले काम करत होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून देखील चांगले काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी आहे. त्यांच्याबद्दल कोणीही विनाकारण प्रश्न निर्माण करू नये त्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही.

हे राज्य महत्वाचे असून राज्य टिकले तरच देश टिकणार आहे. हे सरकार डॅमेज कंट्रोल नाही, अडीच वर्षांत पेन नाही काढला असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राष्ट्रवादीचे जास्त तर ठाकरेंचे आमदार कमी करायचे आणि मग सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री असा प्लॅन तयार झाला होता. म्हणूनच ते खिशात पेन ठेवत नव्हते अशी उपरोधिक टीकाही बावनकुळे यांनी यावेळी केली. इतरांचे सोडा शिवसेनेच्या आमदारांच्या पत्रावर सही करत नव्हते, त्यामुळेच पुढे पराभूत होण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगली भूमिका घेतली. उद्धव शिल्लक सेना आता किंचित सेना केली पाहिजे. असं म्हणत चिन्ह मिळाल्याने शिंदे यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

शिंदेंचे बॅक ऑफिस या सगळ्या मागे काम करत आहे. अब्दुल सत्तार काम करत नाहीत ही विरोधकांकडून तयार केलेली स्क्रिप्ट आहे. या स्क्रिप्ट बाहेर काढून दिवसभर दाखवतात असे विरोधकांना सूनवत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून ते उत्कृष्ट काम करतात असेही कबूल केले.

दरम्यान,ओबीसीला मिळाली त्याप्रमाणे मराठा समजाला सुद्धा इतर समाजाप्रमाणे स्कॉलरशिप देऊन परदेशात जाण्यासाठी लवकर निर्णय घेतला पाहिजे. भाजपवाले मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवतील अशा पद्धतीचे चुकीची माहिती पेरली जात आहे. आम्ही त्यांच्या विरोधात नाही.मोदीजींनी गरीब कल्याण योजनेत जाती,धर्म पाहिला नाही, सर्व योजना सर्वच समाजाच्या लोकांना मिळत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचा मुस्लिम आणि मागासवर्गीय यांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा अजेंडा आहे.

Back to top button