प्रकाश आंबेडकर, "धाडसत्र राजकीय हेतूने केले जात आहे का?"
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सध्या केंद्रीय एजन्सीमार्फत सुरू असलेल्या धाडसत्रात कोण डागाळलेलं आणि कोण धुतल्या तांदळाचं आहे हे कळत नाही, असा टोला वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. तसंच सध्या केंद्रीय एजन्सीमार्फत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी संबंधित असलेल्या लोकांवर धाडसत्र सुरू आहे. मात्र, अशा धाडी अनेकवेळा निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे हे धाडसत्र राजकीय हेतूने केले जात आहे का? अशी शंका उपस्थित होत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
मोठी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. रविवारी प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
आजारपणामुळे पक्षाच्या दैनंदिन कामातून प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिने विश्रांती घेतली होती. त्यानंतर आज शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही आंबेडकर यांची भेट घेतली होती. नवाब मलिक किंवा त्यांचे जावई समीर खान एनसीबीच्या विरोधात फौजदारी गुन्हा का दाखल करत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
राज्यातील काही मंत्र्यांनी वसुलीसाठी सॉफ्टवेअरचा वापर सुरु केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला आहे. फडणवीसांनी याबाबत पुरावे सादर केले पाहिजेत. राजकारणात खळबळ निर्माण करण्यासाठी कुणीही असे आरोप करू नये. कारण काही दिवसांनी लोक अशा आरोपांना करमणूक समजून गांभीर्याने घेत नाहीत, असा सल्ला आंबेडकर यांनी फडणवीसांना दिला. केंद्रीय तपास यंत्रणा जर कुठे धाड टाकत असतील तर त्या धाडीबाबतची माहिती आणि पुढील कायदेशीर कारवाई निश्चित कालावधीत न्याय यंत्रणा आणि जनतेसमोर आली पाहिजे , अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
पहा व्हिडीओ : रिक्षाचा ब्रेक फेल झाला आणि मी खूप खचले