अमरावती; पुढारी वृत्तसेवा : वरुड तालुका अंतर्गत येत असलेल्या सावंगी येथे एका महिलेवर अस्वलाने सोमवार (दि. २४) दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक हल्ला केल्याने महिला जागीच ठार झाली. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी वनविभागावर संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला राजेंद्र भाजीखाये (वय 30 वर्षे रा. सावंगी) असे अस्वलाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला सोमवारी दुपारी दोन वाजता च्या दरम्यान शेतामध्ये कामानिमित्त गेली होती. ऊन लागत असल्याने त्या एका झाडाखाली बसल्या. अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्या शेतामध्ये एकट्याच होत्या. एवढेच नाही तर त्या अस्वलाने त्यांना दूरपर्यंत शेतातून बाहेर फरपटत नेले. यामध्येच त्यांचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. मृत झालेल्या महिलेला बघताच गावकऱ्यांनी वनविभागावर संताप व्यक्त केला. मौजा सावंगी या गावाला लागून जंगल असल्यामुळे शेतातील लोकांना वन्यप्राण्यामुळे भीती आहे. मात्र, वनविभाग या लोकांना संरक्षण देत नसल्यामुळे असे प्रकार घडतात असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर महिलेच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी व पुन्हा अशा घटना होऊ नये. यासाठी वनविभागाने प्रयत्न करावे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आता वनविभाग या प्रकरणाला किती गांभीर्याने घेतात. याकडे मात्र गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.