नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस | पुढारी

नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष 2023-25 साठी नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी., क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष गौरव अग्रवाल, महासचिव एकलव्य वासेकर, कोषाध्यक्ष आशिष लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते. फडणवीस यांनी मागील दशकापासून नागपूर शहर बदलत असल्याकडे लक्ष वेधले. या शहराने नुकताच सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्यातील पहिला पुरस्कार पटकाविला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. मलनि:सारणात नागपूर शहर अन्य शहरांच्या पुढे आहे. नुकताच महानगर पालिकेने स्विडीश कंपनीसोबत करार केला असून येत्या 18 महिन्यात आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे नागपूर शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरू होणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, रियल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची मागणी निर्माण होत असते. म्हणूनच सरकाचेही या क्षेत्राकडे लक्ष आहे. नागपुरात जवळपास 40 कि.मी. परिसरात मेट्रोरेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे रियल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन उपाययोजना करणार आहे. महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात उद्योग येत आहेत. यासाठी भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराला लॉजिस्टीक कॅपिटल म्हणून विकसित करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोन धावपट्टया सुरू होतील तसेच येत्या काळात उत्तमोत्तम रस्ते निर्मिती करून खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

Back to top button