चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील आदिवासी आंदोलनकर्त्या दोन महिलांची प्रकृती खालावली | पुढारी

चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील आदिवासी आंदोलनकर्त्या दोन महिलांची प्रकृती खालावली

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात सुरु असलेल्या आंदोलनातील दोन महिलांची प्रकृती बिघडली. ५० टक्के आदिवासी गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलकर्त्यांपैकी बुधवारी (दि. १९) करिष्मा कुसराम आणि अर्चना कुळमेथे या दोन महिलांची कडक उन्हामुळे प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना स्थानिक ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा शहरात मंगळवारपासून (दि. १८) हजारो आदिवासी बांधव महिलांनी विविध मागण्यांकरीता आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. त्यामध्ये ५० टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा. ५० वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या. सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी. इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा तातडीने मोबदला वाढविण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून या मागण्यांकडे राज्यसरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पोंभूर्णा तालुकासह जवळच्या परिसरातील आदिवासी बांधवांनी मागण्यांपूर्ण होत नसल्याने आंदोलनचा स्विकारला. मंगळवारीृ ४३.६ अंश तापमानात हजारो आंदोलनकर्त्यांनी आंदोलनानंतर रास्ता रोको केले. दरम्यान बराचवेळ वाहतूक खोळंबलेली होती. या आंदोलनात पुरूषांसोबत अनेक महिलांचा सहभाग आहे. कडक उन्हामुळे करिष्मा कुसराम, अर्चना कुळमेथे या दोन महिला आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. बुधवारी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले. आदिवासी बांधवांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे.

Back to top button