चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पूर्वविदर्भात सुर्य दिवसेंदिवस चांगलाच कोपत आहे. मंगळवारी सर्वात जास्त 43.6 अंश तापमान असलेल्या चंद्रपूरला मागे टाकीत ब्रम्हपूरी तालुक्यात सर्वात जास्त तापमान असल्याची नोंद झाली आहे. बुधवारी 0.6 अंशाने तापमानात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. वाढत्या तापमानामुळे पर्यटकांनाही त्रास होत असल्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने व्याघ्र अभयारण्यातील सफारीच्या वेळेत बदल केला आहे.
राज्यात कधी नव्हे ते एप्रिल मध्येच चंद्रपूरसह सर्वच जिल्ह्यात तापमान 42 अंशावर गेले आहे. त्यामुळे उष्णतेची लहर निर्माण झाली आहे. नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. चंद्रपूरसह, गोंदिया वर्धा व गडचिरोलीच्या तापमानात मंगळवारी वाढ झाली होती. आज बुधवारी (दि. १९) चंद्रपूरच्या तापमानात 0.8 अंशाने घट झाली असून 42.8 अंश तापमान आहे. तसेच चंद्रपूर येथून जवळच असलेल्या ब्रम्हपूरी येथे देखील आज तापमान 0.6 अंशाने वाढले असून 43.8 अंश इतकी नोंद घेण्यात आली आहे. विदर्भासह राज्यात या शहरातील तापामान सर्वात हॉट शहर ठरले आहे.
देशात उष्ण शहर म्हणून ओळखल्या चंद्रपूरातील तापमानाचा फटका ताडोबा सफारीकरीता येणाऱ्या पर्यटकांना बसणार आहे. चंद्रपूरातील वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेता ताडोबा व्यवस्थापनाने कोअर झोनमध्ये सफारीच्या वेळांमध्ये बदल केले आहे. ताडोबा अभयारण्यातील सकाळ व सायंकाळच्या सफारीच्या वेळात बदल करण्यात आलेली आहे. यापूर्वी सकाळी 6.30 ते 10.30 या वेळात असणारी सफारी आता 5.30 ते 9.30 यावेळेत होईल. सकाळी 1 तास लवकर सफारी सुरू होणार आहे. तसेच दुपारी 2.30 ते 6.30 या वेळातील सफारी आता 3 .00 ते 7.00 यावेळात होईल. सायंकाळी सफारी 1 तास सफारी उशिरा सुरू होणार आहे. हा बदल ताडोबाच्या कोअर झोनमध्ये उद्या 20 एप्रिलपासून लागू होणार आहे. बफर झोन मध्ये पूर्वीप्रमाणेच सफारी होणार असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने कळविले आहे.