

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी दिसली तरी फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच होईल. ठाकरेंच्या सभा मोठ्या करण्यासाठी किती पैशाचा गैरवापर होतो, हे सर्वांनाच माहिती आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपुरात आज जनता दरबार झाला.यानिमित्ताने ते माध्यमांशी संवाद साधत होते. बानवकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले जे नगसेवक, लोकप्रतिनिधी शाखाप्रमुख व कार्यकर्ते आहेत ते शिंदे यांच्या शिवसेना व धनुष्यबाणाकडे जाऊ नये. त्यासाठी त्यांची पक्ष वाचविण्याची धडपड सुरू आहे. हिंदुत्ववादी विचाराशी तडजोड केली. त्यामुळे कुणीही शिवसेनेचा कार्यकर्ता उद्धवजीसोबत रहायला तयार नाही. त्यांच्याकडे असेलेल कार्यकर्ते काही शिंदेकडे जातील तर काही आमच्याकडे येतील, असाही दावा त्यांनी केला.
दरम्यान,शरद पवारांनी कसबा निवडणुकीचा पुन्हा एकदा विश्लेषण करावे, असा सबुरीचा सल्ला देत बावनकुळे म्हणाले, आम्ही वारंवार सांगतो कसब्याचा विजय महाविकास आघाडीचा विजय नसून तो धंगेकरांचा आहे. आम्हाला अपेक्षित मते मिळाले होते. चारही पक्षांनी एकत्र यावे, आम्ही ५१ टक्के मतांची तयारी करू असे आव्हान त्यांनी दिले. अडीच वर्षे मागच्या सरकारच्या काळात सत्तेचा दुरुपयोग झाला, त्यामुळे तालिबानी कोण हे सर्व जनतेला माहिती आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिले.
महाविकास आघाडीमधील जबाबदार आमदार कर्नाटकमध्ये जाऊन महाराष्ट्राची मने दुखवितो. अशावेळी उद्धवजी एका मिनिटात प्रतिक्रीया देतात, अजुनही त्यांची प्रतिक्रीया आली नाही. आम्ही त्यांच्या प्रतिक्रीयेची वाट बघत आहोत. आम्ही धीरज देशमुख यांच्या प्रतिक्रीयेचा निषेध व्यक्त करीत असल्याचे सांगून उद्धव ठाकरे आता झोपले आहेत का? असाही टोला लगावला.
नाना पटोले यांनी होळीच्या दिवशी टीका करू नये पंचमीला सांगू, त्यांचा पक्ष फूटतो आहे, तो थांबविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असा इशारा दिला. गोंदिया जिल्ह्यातील दहिवले हा कॉंग्रेसचा मोठा नेता भाजपात आला, रोज कॉंग्रेस फुटत आहे. त्यासाठी होळीला नमस्कार करून कॉंग्रेस फुटू नये अशी प्रार्थना करावी असा चिमटा काढला.
मविआने विविध योजनांचे ४००० हजार कोटी रुपये थांबविले होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर हा निधी मिळाला. बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, नागपूर जिल्ह्याची डीपीसी ८०० कोटीची आहे. यासोबतच एसटीपी, जीएसटी मिळून ११५० कोटी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी मिळणार आहे. त्यातून नागपूरच्या विकासाला निश्चितच गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.