यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्ष सुरु | पुढारी

यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्ष सुरु

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची आज ( दि. ३) मुहूर्तमेढ रोवली. दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजनांची निर्मिती करून त्या माध्यमातून दिव्यांगांना सामान्यांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा राहणार आहे. आज यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्षाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल दिव्यांग सहाय्य कक्षाचे लोकार्पण तसेच दिव्यांग उन्नती पोर्टलचे उद्घाटन, विविध विभागांच्या योजनांचे लाभ वाटप जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक पवनकुमार बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, चितंगराव कदम आदीसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी विविध विभागाच्या मार्गदर्शन व घडी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा आणि अमृत आवास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ, तसेच गरजू दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदमधील पाच टक्के सेंस निधीतून दिव्यांग सहायता वस्तुंचे वितरण आणि प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तु देण्यात आल्यात. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी गायन आणि नृत्यकलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

यावेळी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्षाच्या निर्मितीमुळे दिव्यांगांची माहिती एकत्रितपणे जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध होईल. दिव्यांगांनी सुद्धा उन्नाती पोर्टलवर सर्व माहिती नोंदवावी. या माहितीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोणत्या योजना कार्यान्वित करता येईल, याचे नियोजन करता येईल, असे संजय राठोड यांनी सांगितले. सर्व महिलांना आश्वस्त करतो की, यापुढे कोणीही माता भगिनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन दिसणार नाही. गावातील सर्व नागरिकांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी राबवलेल्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल पालकमंत्री यांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, शासकिय योजनांमध्ये दिव्यांगांना प्राथमिकता देण्यात येईल. जिल्हा परिषद विभागाने झेप, आरंभ, महादीप असे महत्वाचे ड्रिम प्रोजेक्ट राबवले, जे महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्ट आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदच्या सर्व चमूचे अभिनंदन त्यांनी केले.

विनय ठमके यांनी प्रास्ताविक तर चंद्रबोधी घायवटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता प्रदीप कोल्हे, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे आदीसह विभाग प्रमुख उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सभागृह गहिवरले

यावेळी स्वच्छता दूत म्हणून कार्यरत असणारी इयत्ता बारावीत शिकणारी कर्णबधिर विद्यार्थ्यांनी खुशी डवरे आणि जोया शेख जहीर या बहु विकलांग मुलीने नृत्य तर बहु विकलांग साक्षी अलोणे हिने ‘जय शारदे वागेश्वरी’ हे गीत सादर केले. या  विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सभागृह अक्षरश: गहिवरले.

हेही वाचा :  

Back to top button