Gramhit : यवतमाळमधील दाम्पत्याने स्थापन केलेले ‘ग्रामहित’ फोर्ब्सच्या यादीत

gramhit
gramhit

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्याने स्थापन केलेल्या शेतमाल विपणन कंपनीचे नाव फोर्ब्सच्या यादीत झळकले आहे. यावर्षी सहभागी झालेल्या ६५० कंपनीमधून 'ग्रामहित'ची (Gramhit) निवड झाल्याने यवतमाळच्या लौकिकात भर पडली आहे. आर्णी तालुक्यातील वरुड (तुका) येथील पंकज व श्वेता महल्ले हे तरुण दाम्पत्य ग्रामहितचे संस्थापक आहेत.

कार्पोरेट जीवनशैली सोडून थेट गाव गा‍ठले

कोरोनाच्या काळात पंकज महल्ले या तरुणाने कार्पोरेट जीवनशैली सोडून पत्नी श्वेतासह थेट गाव गाठले. कोरोनामुळे लागलेली टाळेबंदी आणि या काळात शेतकरी बांधवांची होत असलेली आर्थिक घुसमट, फरफट त्यांनी जवळून अनुभवली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी 'ग्रामहित प्रा. लि. कंपनी' (Gramhit) वरूड (तुका) गावात स्थापन केली. 'ग्रामहित'च्या माध्यमातून शेतमाल विक्री व्यवस्थेत होणारे शेतकऱ्यांचे शोषण थांबावे. त्यांच्या मालास अधिक दर मिळून आडत, हमाली, मापारी यात खर्च होणाऱ्या त्यांच्या पैशांची बचत व्हावी, तसेच योग्य भाव मिळेपर्यंत शेतमाल तारण ठेवून त्यावर माफक दरात कर्ज सुविधा उपलब्ध असावी; या दृष्टीने मोबाईलच्या माध्यमातून बाजार व्यवस्था शेतकरीपुरक, सुलभ आणि विश्वसनीय करण्याचा पंकजचा प्रयत्न आहे.

'व्हिलेज ट्रेड सेंटर' मॉडेल प्रभावीपणे राबवले

ऑगस्ट २०२० मध्ये ग्रामहितला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून परवाना मिळाला. शेतमाल विपणन व्यवस्थेवरील 'व्हिलेज ट्रेड सेंटर' हे प्रभावी मॉडेल गेल्या दीड वर्षांपासून वरूड (तुका), सावळी सदोबा आणि कळंब येथे प्रत्यक्ष वापरले जात आहे. १२ तासांच्या आत विक्रीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात कुठलीही कपात न करता जमा होतात. ग्रामहितने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन 'क्वॉलिटी ॲनालेसिस'वर भर‍ दिला आहे. यापूर्वी 'महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी'च्या वतीने दिल्या जाणारा पुरस्कार ग्रामहितला मिळाला आहे.

'ग्रामहित' शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

'ग्रामहित'द्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतमाल विक्री व्यवस्थेच्या या वैशिष्ट्यपूर्ण साखळीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा घेतली आहे. अमेरिकेतील 'ॲक्युमन इंटरनॅशनल फेलोशिप'साठी पंकजची निवड झाली. पंकज महल्ले यांनी यवतमाळ येथील सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातून पदवी तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टाटा सीएसआर प्रकल्पांतर्गत जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये उच्च पदावर काम केले आहे. तेथील नोकरी सोडून त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे पारदर्शी मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला आणि आज 'ग्रामहित' शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news