

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा
वन्यप्राण्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं. विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात याचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी नंदू शिवरकर यांनी विद्यूत तारा सोडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्याने दोन वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नंदू शिवरकर या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. रामटेक-पंचाळा रोडवरील पंचाळा शिवारात बंद असलेल्या चित्रकूट वॉटर पार्कजवळील टॉवरजवळच्या शेतात ही घडना घडली.
वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला बिबट्याचा स्पर्श झाला. यात एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन दिवसांपूर्वी झाला असावा. मात्र, याबाबत वनविभागाला उशिरा माहिती मिळाली. रामटेकचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत पंचनामा करून बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. नंतर घटनास्थळी अग्नी देण्यात आला.
या घटनेत शेतमालक नंदू शिवरकर (रा. पंचाळा) याला अटक करण्यात आली. त्यांचे शेत सर्व्हे क्रमांक ४३ , पंचाळा येथे ही घटना घडली. शेतातील पिकांची वन्यप्राण्यांकडून होणारी नासधूस टाळण्यासाठी विद्युत प्रवाह लावल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वापरलेला तार, खुंट्या वनविभागाने जप्त केल्या आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत नंदू शिवरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे पंचाळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्रपाल रितेश भोंगाडे, वनक्षेत्र सहायक भगवान गोमासे, वनरक्षक स्वरूप केरवार, कालू बेलकर तपास करीत आहेत. शवविच्छेदनाप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी प्रीती शिरसाठ, अश्विनी गडमडे, सय्यद बिलाल अली व वनकर्मचारी हजर होते. मानव आणि प्राणी असा हा संघर्ष आहे. वन्यप्राणी शिवारात येऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात. ते शेतशिवारात येऊ नये, यासाठी जाळीचे कुंपन करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.