

पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून, आता केवळ कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार असून, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडणार आहे.
मात्र, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मागील पंधरा दिवसांपासून मराठवाड्याचा काही भाग वगळता कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि आसपासच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले असल्याचे चित्र पुढे आले आहे. दरम्यान, बुधवारी कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. मात्र, त्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस कमी झाला आहे.
यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.