

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सियस पार झाले असून, उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी व शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.
विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करणे.
उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे.
उन्हात बाहेर पडणे टाळणे.
संपूर्ण एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी 07.00 ते 11.15 वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली तर माध्यमिक शाळांसाठी 07.00 ते 11.45 वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी दिली.
राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले असून शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.