

उल्हासनगर : शहरात वारंवार होणारे वीजपुरवठ्यातील खंड, वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी तसेच उघड्या वीजतारा आणि खराब खांबांच्या समस्यांबाबत उल्हासनगर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत नागरिकांच्या विविध समस्या मांडून त्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.
उल्हासनगर कॅम्प 3 येथील साईबाबा मंदिराजवळील महावितरण कार्यालयात शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. शहरप्रमुख सचिन कदम, कल्याण लोकसभा युवासेना सचिव हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर तसेच माजी नगरसेवक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडल्या..बैठकीत वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, उघड्या वीजतारा, वीजखांबांशी संबंधित समस्या, स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी, वाढीव वीजबिले आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महावितरणचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, अधीक्षक अभियंता विजय फुंदे आणि कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांनी या समस्या गांभीर्याने घेत पुढील दहा दिवसांत आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी केल्याची तक्रारही बैठकीत करण्यात आली. या तक्रारीची माहिती मिळताच मुख्य अभियंता मिश्रा यांनी विजय नावाच्या कर्मचाऱ्याला कामावरून हटविण्याचे आदेश दिले. शहरातील वीजपुरवठा व्यवस्था सुरळीत करावी, वारंवार होणारी वीजकपात थांबवावी, उघड्या तारा व खराब वीजखांबांच्या समस्या तातडीने दूर कराव्यात तसेच वाढीव वीजबिलांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. या बैठकीला नगरसेवक सूरज सोनकांबळे, रवि निकम, सुनील पवार, जयकुमार केनी, प्रमोद पांडे, संदीप सुर्वे, विनोद सालेकर, ज्ञानेश्वर मरसाले, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर करवंदे, अनिल मराठे, तुषार बादल, उमेश कुंदे, आदेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.