

उल्हासनगर : उल्हासनगरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जुली वाघरी, मटकी वाघरी, विणू वाघरी आणि त्याच्या सोबतच्या मुलाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गीता प्रेम राजपूत (वय ५०) या मजुरीचे काम करत असून त्या विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन जवळ गोपाळ समाज मित्र मंडळ येथे राहायला आहे. बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या बहिणीच्या सुनेसोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी तसेच राज राजपूत आणि सुनील राजपूत यांना शिवीगाळ व दमदाटी करत बेदम मारहाण केली. यातील सुनील राजपूत हा रिलायन्स कंपाउंडमध्ये कामावर असताना आरोपींनी त्याला बाहेर फरफटत रस्त्यावर आणत मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुनीलच्या डोक्याला, गळ्याला, पाठीवर आणि पायावर गंभीर दुखापती झाल्या. तसेच फिर्यादी गीता राजपूत यांच्या डोक्यातही मार लागून दुखापत झाली आहे.
या घटनेत जखमी झालेल्या तिघांनाही उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन महिलाना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार झाले आहेत.