

ठाणे : पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मुंब्रा रहिवाशांवर अन्याय होत आहे. मुंब्रा-कौसाच्या वाट्याचे 17 लाख लिटर्स पाणी चोरले जात आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आता आम्ही केवळ गुलाब दिले आहे. आणखी दोनवेळा गुलाब देऊ नंतर रिकामे हंडे फेकू, असा इशारा पठाण यांनी दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा, कौसा परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली असून पालिकेकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांना चक्क पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्या निषेधार्थ मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया पठाण आणि सुमारे 25 ते 30 महिलांनी ठामपा आयुक्त सौरव राव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जिया पठाण यांची भेट घेतली. पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमोल्डींगचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यावर मर्जिया पठाण या चांगल्याच संतापल्या.
ठाणे महापालिकेकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. एकीकडे 17 लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होत आहे. या चोरीमागे पाणी माफिया की व्हॉल्वमॅन आहेत, याचा शोध पालिकेने घ्यायला हवा. पण, तो घेतला जात नाही. सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणी माफिया गब्बर होत आहेत. सोमवारी (दि.6) रोजी शांततेत आंदोलन झाले आहे. पुन्हा दोन वेळा आम्ही ठाणे महानगरपालिका अधिकार्यांना गुलाबाची फुले देऊ त्यानंतरही जर पाण्याची टंचाई संपली नाही तर रिकामे हंडे आणि कळश्या अधिकार्यांना देऊ, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला आहे.