

ठाणे : ठाणे शहरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे हवामान बदलामुळे धोका वाढत असतानाच, दुसरीकडे ठाणे महानगरपालिका अजूनही पदपथावरील अनधिकृत जाहिरात फलकांवर ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला आहे. (maharashtra navnirman vidyarthi sena)
एक वर्षांपूर्वी घाटकोपरमध्ये जाहिरात फलक पडून १७ लोकांचा बळी गेला होता. या प्रकरणाला वर्ष उलटले तरी अद्यापही ठाणे महापालिका अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
२१ जून २०२३ रोजी वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील हिरानंदानी मेडोज व सिंघानिया शाळेजवळ लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईचे आदेश जाहिरात विभागाने अतिक्रमण विभागाला दिले होते. मात्र, आजतागायत संबंधित ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, मनसेने या कारवाईच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा अनधिकृत फलकांमुळे पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. पदपथावरील या अनधिकृत जाहिरात फलकांबाबत ठाणे महानगरपालिकेने तातडीने कारवाई करण्याबाबतचे निवेदन पालिका प्रशासनाला दिले आहे.
“ ठाणे महापालिकेने अनधिकृत जाहीरात फलकांवर कारवाई करण्याच्या आदेशाला २ वर्ष होतील तरी अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? महापालिकेने जर या फलकांवर तातडीने कारवाई करावी आणि लोकांना सुरक्षितेची हमी द्यावी”
संदीप पाचंगे, सरचिटणीस,मनविसे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार पदपथावर व रस्त्यावर जाहिरात फलक लावणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेला अशा अनधिकृत फलकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनसेच्या तक्रारीत ठाणे महानगरपालिका आणि संबंधित विभागांनी न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.