

ठाणे : आज सोमवार (दि.२२) रोजी पासून पुढचे सलग सहा दिवस ठाण्याच्या खाडीला भरती येणार असून, यावेळी 4 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने खाडी किनारी राहणार्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुढचे काही दिवस ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, आज पासून 27 जुलै पर्यंत ठाणे खाडीला भरती येणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी 24 जुलै रोजी जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती येणार असून, यावेळी 4.54 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
दरम्यान, मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये पुढचे काही दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर टीडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आहे. यादरम्यान अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचीही शक्यता असून, भरतीमुळे पाण्याचा निचरा होणे कठीण होण्याची भीती आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवरक्षक व अग्निशमन दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.