

भिवंडी : भिवंडीमध्ये अल्पवयीनांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शहराच्या विविध भागातून पुन्हा 3 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर मागील एका आठवड्यात येथून डझनभर अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. सतत बेपत्ता होणार्या मुलांचे अपहरणाचे गुन्हे पोलिस नोंदवत आहेत, परंतु त्यांचा शोध घेण्यात किंवा अपहरणकर्त्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तत्परतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर पालकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भिवंडीच्या कशेळी भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 19 जुलै रोजी सकाळी घराबाहेर पडली, पण परतलीच नाही. याप्रकरणी मुलीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, एका अज्ञात व्यक्तीने तिचे आमिष दाखवून अपहरण केले आहे. त्याचप्रमाणे, दुसरी घटना फातमानगर परिसरात घडली आहे.
एका महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, तिचा 13 वर्षांचा मुलगा 18 जुलै रोजी रात्री 9 वाजता शेजारच्या एका व्यक्तीशी बोलत होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाचा खूप शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्या आईच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात तिच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून या नोंदवलेल्या गुन्ह्या बाबत महिलेने आरोप केला आहे की, एका अज्ञात व्यक्तीने तिच्या मुलाच्या बालपणाचा फायदा घेऊन अपहरण केले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तिसरी घटना स्थानिक गैबीनगर परिसरातील आहे.
19 जुलै रोजी 13 वर्षांचा अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध घेत आहेत. परंतु पोलिसांच्या अपयशामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.