

ठाणे: तिसऱ्या मुंबईच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली असून आता सिंगापूर-स्थित कंपनीला या शहराचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे.रायगड, मुंबई आणि नवी मुंबईशेजारी तिसरी मुंबई उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतूजवळ या प्रकल्पाचा विकास केला जात आहे. 324 चौरस किमी भूखंडावर हे शहर उभारणार आहे.
सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहराच्या फेज 1 साठी सिंगापूर-स्थित 'सरबाना जुरॉन्ग इंफ्रास्टक्चर प्रा.लि.' ही कंपनी आराखडा तयार करत आहेत. रायगड जिल्ह्यातील 124 गावांमध्ये हे शहर उभारणार आहेत.
करनाळा-साई-चिरनर न्यू टॉऊन असं या तिसऱ्या मुंबईचं नाव असेल. जानेवारीमध्ये MMRDA आणि या सिंगापूर-स्थित कंपनीमध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये तिसऱ्या मुंबईच्या विकास आराखड्याचाही समावेश होता. गुरूवारी राज्य सरकारने या कपंनीला मास्टरप्लॅन तयार करण्यासाठी मंजुरी दिली आणि अधिकृत सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं.
पहिल्या टप्प्यात 11.89 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील टप्प्यासाठी नगरविकास विभागाच्या मंजुरीची गरज असेल. यामध्ये 23.12 कोटी रुपये निधीनुसार नियोजन केलं जाणार आहे. सध्या रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांमधील जमिनीचा कसा वापर केला जात आहे.
याचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार योजना तयार करण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ तयार करण्यात येत असलेल्या 'नैना'मधील 80 गावं तिसऱ्या मुंबईत येतात. तसचं खोपटा न्यू टाऊन परिसरातील 33 गावं, महामुंबईतील 2 आणि रायगड जिल्ह्यातील 9 गावांचा समावेश आहे.