![ठाणे : सोशल मीडियाचा भूलभुल्लैय्या तरुणाईसाठी धोकादायक; प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीचे अपहरण](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2FReal-estate-listing-presentation-5-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाचा भूलभुलैया तरूणाईसाठी किती धोकादायक असतो याची प्रचिती एका अल्पवयीन मुलीला आली. इंस्टाग्रामवर ओळख वाढवून या मुलीला एकाने प्रेमजाळ्यात ओढले. आता या प्रेमविराला पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. या मुलीला पळवून नेणाऱ्या अपहरणकर्त्याला लोहमार्गच्या कल्याण क्राईम ब्रँचने बेड्या ठोकून गजाआड केले आहे.
कुणाल रविंद्र रातंबे (23) असे अपहरणकर्त्याचे नाव आहे. अवघ्या ४८ तासात अपहृत मुलीचा शोध घेण्यात क्राईम ब्रँचला यश आले आहे. ही अल्पवयीन मुलगी सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान आपल्या कुटुंबासह प्रवास करत होती. याच दरम्यान ही मुलगी अचानक गायब झाली. याप्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. क्राईम ब्रँचने बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला.
स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासले असता ही मुलगी आढळून आली. पुढील तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सदर मुलगी आरोपी कुणालसह कर्जत येथील एका गावात असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक होळकर, गजानन शेडगे, अमित बडेकर, अनिल खाडे, राजेश कोळसे, शशिकांत कुंभार, इम्रान शेख, सोनाली पाटील या पथकाने तत्काळ या गावात घुसून अपहरणकर्त्या कुणाल रातांबे याला बेड्या ठोकल्या आणि मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. कुणाल याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून या मुलीशी मैत्री वाढवली. प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याने मुलीला पळवून नेल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.