

नेवाळी : किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्री मलंगगडाचा निकाल लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केला आहे. बुधवारी माघ पौर्णिमेनिमित्त ते मलंगगडावर आले होते. शिवसेनेकडून मलंगगडावर महाआरतीचे आयोजन करण्यात येते. या आरतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी उपस्थित असतात.
अयोध्येतील राम मंदिरानंतर मलंगगडच्या न्यायालयीन लढ्याला बळ देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्री मलंगगडचा निकाल लागणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माघ पौर्णिमेला मत्स्येंद्रनाथ यांची आरती करतात. मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं यावरून 1952 सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहे. हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हाजीमलंग शाह बाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे. सद्यस्थितीत दोन्ही धर्माचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात. मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली. ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आजही पाळली जात आहे.
दरम्यान, बुधवारी (दि.12) मलंगगडावर महाआरती झाल्यानंतर शिंदेनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले कि, दुर्गाडीप्रमाणे आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. न्यायदेवतेवर विश्वास आहे, दुर्गाडी प्रमाणे मलंगगडचा निकाल देखील लवकरच लागेल असा विश्वास व्यक्त त्यांनी म्हटले आहे. मलंगगडच्या आंदोलनात अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. तर मलंगगडावर महा आरतीवरुन अनेक वाद देखील निर्माण झाले होते. या वादांचा सामना शिवसैनिकांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे जर मलंगगडचा निकाल लागल्यास आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे. यावेळी हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, महेश पाटील यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर मोठ्या संख्येने शिवसैनिक माघ पौर्णिमेला येत असतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेली हि परंपरा आहे. या परंपरेनुसार मोठ्या संख्येने शिवसैनिक राज्यभरातून मलंगगडावर येत असतात. माघ पौर्णिमेला शिवसेनेकडून दरवर्षी एक आरती होत असे. मात्र पक्षाची विभागणी झाल्यानंतर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे सेनेकडून स्वतंत्र आरती केली जात आहे. माघ पौर्णिमेला देखील ठाकरे सेनेने स्वतंत्र महाआरती उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येण्याआधीच करून घेतली आहे.