ठाणे : आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यावेळी 13 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान भांगेच्या गोळ्यांची तस्करी ही रेल्वेच्या पार्सल विभागातून होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणामध्ये अकबर खान नामक व्यक्तीस अटक करण्यात आली असून याच्या चौकशीमध्ये त्याने उत्तर प्रदेशातून मागविलेल्या 13 लाख 60 हजारांच्या भांगेच्या गोळ्यांचे पार्सल जप्त करण्यात आले आहे. आयुर्वेदिक गोळ्यांच्या नावाखाली भांग मिश्रित अमली पदार्थांच्या तस्करी करणार्या अकबर याला 2 सप्टेंबर 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी 16 जणांना चार वेगवेगळ्या पथकांनी अटक केली.
या टोळीने तस्करीसाठी चालविलेल्या विजयवटी नावाचा अडीच किलो किलोग्रॅम वजनाचा भांग मिश्रित पदार्थाचा साठा तसेच सहा वाहने असा 42 लाख 33 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल बांद्रा, बोरिवली, कल्याण, भिवंडी, ठाण्यातील मानपाडा भागातून जप्त केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने कारवाई करत भांगेच्या गोळ्याच्या तस्करीचा माल जप्त केला.