ठाणे : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उबाठा आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच खटके उडत असून रविवारी (दि.2) पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
उबाठा पक्षाच्या वतीने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या आधी उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी टेंभीनाका परिसरात असलेल्या दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुतळयाला अभिवादन केले.
काही क्षणातच त्याच ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडणार त्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत अनुचित प्रकार थांबवला. मात्र दोन्ही कडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उबाठा कडून अभिवादन करण्यात आल्यानंतर अपवित्र हातांचा स्पर्श आनंद दिघे यांच्या पुतळ्याला झाला असल्याचा आरोप करत शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकार्यानी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक केला. उबाठा पक्षाच्या वतीने ठाण्यातील एन.के.टी महाविद्यालायात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी उबाठा पक्षाचे नेते खा. संजय राऊत, खा. विनायक राऊत, आदी नेते उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांचा ताफा आनंद दिघेंच्या आंनदाश्रमाकडे येताच शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी शहर प्रमुख हेमंत पवार, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, सुधीर कोकाटे यांनी राऊतांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच ठाकरे शिवसेनेच्या ताफ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अडवले. दोन्ही बाजुने घोषणा सुरु केल्या. याच वातावरणात संजय राऊत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि शाल अर्पण केली आणि हा ताफा मेळाव्याकडे रवाना झाला. यानंतर शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी दिघेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी पोहचले आणि अपवित्र हाताने हार घातल्याचे सांगत दुग्धाभिषेक केला आणि राऊतांची पांढरी शाल फेकून, भगवी शाल घातली. त्यानंतर राऊंतांच्या सकाळच्या भोंग्यावर जोरदार टिका केली.
टेंभी नाक्यावर तोपर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याना एकत्र येऊन न दिल्याने पुढचा अनर्थ टळला. यापूर्वी शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही पक्षात मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. संजय राऊत गेल्या 25 वर्षात कधी अनंद दिघे यांना अभिवादन करायला गेले नाहीत मग आजच का गेले असा प्रश्न शहरप्रमुख हेमंत पवार यांनी उपस्थित केला.