

Thane Municipal Corporation Shilgaon Funeral Issue
शुभम साळुंके
नेवाळी : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या शिळं गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जलनिस्सारण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने अनेक रस्ते गुडघाभर पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी (दि.३) ग्रामस्थांवर चक्क अंत्ययात्रा गुडघाभर पाण्यातून काढण्याची वेळ आली होती. या घटनेने ठाणे महापालिकेच्या नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
शुक्रवारी शिळं गावात अंतयात्रेत सहभागी झालेले ग्रामस्थ गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना दिसून आले आहेत. दुसऱ्या बाजूला परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व जलनिस्सारणाची कामे झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या कार्यपद्धतीवर त्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकारावर मनसेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी ठाणे महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. "ना जगू देत, ना मरू देत, अशी परिस्थिती महापालिकेने निर्माण केली आहे. अनेक वर्षांपासून निवेदने देऊन तसेच 'एक्स'च्या माध्यमातून सातत्याने या समस्येकडे लक्ष वेधले. मात्र दिवा प्रभाग समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले," असा आरोप त्यांनी केला आहे.
येत्या दोन दिवसांत शिळं गावातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामस्थांसह ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रतीकात्मक 'तेरावा' आणि 'दहावा' विधी घालून आंदोलन करेल, असा इशाराही शरद पाटील यांनी दिला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शिळं गावाला याच समस्येचा सामना करावा लागत असताना, प्रशासन मात्र आश्वासनांच्या पलीकडे जात नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये तीव्र झाली आहे. त्यामुळे तातडीने जलनिस्सारण व्यवस्था सुधारून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.