

पालघर (ठाणे) : विरार ते जलसार अशा बहुचर्चित रो रो सेवा शनिवारपासून प्रायोगिक तत्वावर सुरुवात होत आहे. या रो रो सेवेच्या शुभारंभ बाबतीत अनेक उलट सुलट चर्चा जिल्हाभरात रंगत होत्या. अखेर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्याला मुहूर्त मिळाला असून तीन सत्रामध्ये ही रो रो सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.
विरार ते जलसार रो रो सेवा जानेवारीमध्ये सुरू होणार अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू होती. मात्र फेब्रुवारीमध्ये या सेवेचा शुभारंभ केला जाईल असे मंडळामार्फत सांगण्यात आले होते.
रोरो फेरीच्या चाचणीचे काम अखेर पूर्ण झाले असून ही सेवा नारंगी - जलसार व जलसार-नारंगी अशी असणार आहे. पालघर ते विरार असा प्रवास करणाऱ्यांसाठी ही सेवा सुलभ व वेळ वाचविणारी ठरणार आहे. रो-रो फेरीबोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी व बोटीमधून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढ- उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची सर्व ती खात्री व चाचपणी सागरी मंडळामार्फत करण्यात आली आहे. फेरीबोट सेवेचे तिकीट दर ठरवण्यात आले असून फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही व आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने जनतेसाठी ही सेवा नक्कीच कमी वेळेची व दिलासादायक ठरेल असा विश्वास सागरी मंडळाचा आहे. खारवाडेश्री (जलसार) ते नारंगी हे रस्त्याचे अंतर ६० किलोमीटरचे असून सर्वसाधारणपणे या प्रवासासाठी दीड तास लागतो. मात्र जल मार्गाने हाच प्रवास १५ ते २० मिनिटांचा होणार आहे. या सेवेमुळे पालघर व वसई तालुक्यातील नागरिकांच्या प्रवास वेळेत मोठी बचत होणार आहे. या जलमार्गामुळे वसई- विरार ते सफाळा-केळवा परिसरात प्रवास करणे सुलभ होणार असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल अशी शक्यता आहे.
पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून विरार येथून रस्ता मार्गे ७० किलोमीटरवर असणारे हे अंतर या जलमार्ग सोयीमुळे निम्म्यावर येईल. आजपासून सुरू होणाच्या रोरो सेवा सकाळी साडेसहा वाजता विरार येथून तर सफाळे जळसार येथून ६:४५ वाजता सुटेल दर पंधरा मिनिटांच्या अंतरावर सकाळ दुपार व रात्री ही सेवा सुरू राहणार आहे शेवटची सेवा विरार पासून दहा वाजता तर जलसार पासून दहा वाजून दहा मिनिटां पर्यंत राहणार आहे. नारंगी ते जलसार दरम्यान रो-रो सेवा अंतर्गत जेटी उभाण्यास जलसार व खारमेंद्री गावातील वन विभागाच्या जागेतील खारफुटी असलेल्या जागेचा अडथळा निर्माण झाला होता.
खारफुटी असलेली ४७९० चौरस मीटर क्षेत्रफळावरील जागा वन विभागाकडून महाराष्ट्र सागरी मंडळाकडे वळविण्यास राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने परवानगी दिल्याने या रोरो प्रकल्प अंतर्गत खारवाडेश्री येथे जेटी व पोहोच रस्त्याच्या उभारणीतील अडथळा त्यानंतर दूर झाला. विरार व जलसार येथे फेरीबोट लागणारी जेट्टी पूर्ण झाली असून या जेट्टीवर फेरीबोट लागण्याच्या दृष्टीने चाचपनी सुरु आहे. या सेवेशी संबंधित ९५ टक्के काम पूर्ण असून पाच टक्के काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल व ते लोकार्पणासाठी सज्ज असेल असे सागरी मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
खारवाडेश्री (जलसार) येथे जेटी उभारण्याच्या ठिकाणी संरक्षित वनक्षेत्र व पाणथळ असलेले ४७९० चौरस मीटर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात असल्याने जेटी उभारणीच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता. वनविभागाची जागा महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नावावर हस्तांतरित होण्यासाठी तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या खारफुटीचे योग्य संरक्षण व संवर्धन व्हावे या दृष्टीने किनारपट्टी नियमन क्षेत्र प्राधिकरण यांची ६ एप्रिल २०१७ रोजी परवानगी घेण्यात आली होती. त्यानंतर राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने या रो रो जेटी संदर्भात २ ऑगस्ट २०१७ रोजी मंजुरी दिली. पाठोपाठ वन विभागाने या संदर्भात २२ ऑक्टोबर २०२० रोजी प्राथमिक मान्यत, मुंबई उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी तर सर्वोच्च न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२३ रोजी या कामासाठी मान्यता दिल्यानंतर वनविभागाची जागा महाराष्ट्र सागरी मंडळकडे वर्ग करण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. या संदर्भात राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने २ जुलै रोजी काढलेल्या आदेशान्वये वन विभागाची पालघर तालुक्यातील जलसार व खारमेंद्री येथील जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतर करण्याची मान्यता दिली. त्यानुसार फेरीबोटीसाठी जेट्टी बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले.