ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रबळ नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्रा येथे केलेल्या भाषणावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. ऋता आव्हाड यांनी आपल्या भाषणात डॉ.अब्दुल कलाम कसे घडले यासाठी त्यांचे चरित्र वाचा असे असे आवाहन त्यांनी श्रोत्यांना केले. मात्र हे सांगितल्या नंतर त्यांनी आयुष्याची दुसरी बाजूही असते, ओसामा बिन लादेन जन्मापासून आतंकवादी नव्हता त्याला समाजाने आतंकवादी बनवले असा उल्लेख केल्याने ऋता आव्हाड यांच्या या विधानामुळे सत्ताधारी पक्षाच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.
लादेनवर वक्तव्य करून ऋता आव्हाड यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. आम्ही पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे. तर ऋता आव्हाड यांची ही भूमिका शरद पवार, सुप्रिया सुळे आणि डॉ राजेश टोपे यांना पटते का ? असा प्रश्न भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे. सर्वात मोठा दहशतवादी ओसामा बिन लादेनची तुलना डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी करून देशात खळबळ उडवून दिली आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी मुंब्रा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वतः खासदार सुप्रिया सुळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून येणार होत्या. मात्र त्या या कार्यक्रमाला त्या आल्याच नाहीत. ऋता आव्हाड यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. ओसामा बिन लादेन हा त्याच्या आईच्या पोटातून दहशतवादी जन्माला आला नसून समाजाने त्याला दहशतवादी बनवले, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावर सत्ताधाऱ्यांकडून ऋता आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठा अंतकवादी ओसामा बिन लादेन आणि माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन आब्दुल कलाम यांची तुलना केली असल्याचे आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. लादेनवर वक्तव्य करून ऋता आव्हाड यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. राष्ट्रवादीकडून लादेनवरील वक्तव्याचा तीव्र निषेध करत असल्याचे सांगत पोलिसांनी व्हिडिओ तपासून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.
ओसामा बिन लादेनचे उदाहरण देणं हा राष्ट्रद्रोह असून लादेन आणि कलाम यांची तुलना करणं हाच राष्ट्रद्रोह असल्याचे परांजपे यांनी सांगितले. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील ऋता आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. यासंदर्भातलं उत्तर हे शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी द्यावं, त्यांची ही भूमिका जयंत पाटील, डॉ राजेश टोपे यांना मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ही जी तुतारी लादेनच्या उदात्तीकरणासाठी वाजते त्याच्या संदर्भात भूमिका स्पष्टीकरण देऊन ती बंद करावी अशी टीका त्यांनी केली आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे हे खपवून घेतलं जाणार नाही असे डावखरे यांनी सांगितले.
हल्लीची पिढी वाचन अजिबात करत नाही. जे मोबाईलच वेड लागलंय ते बाजुला घ्या आणि लोकांना वाचा. डॉ अब्दुल कलाम कसे घडले यासाठी त्यांचे चरित्र वाचा. यापूर्वी मी ए .पी. जी अब्दुल कलाम यांच 'विंग्स ॲाफ फायर' त्यांना वाचयला सांगितलं होत. एक नावाडी याचा मुलगा असुन त्यांनी इस्त्रोचा अध्यक्ष होण्यापर्यंत जी मजल मारली ते अमेझिंग आहे. मात्र दुसरी ही आयुष्याला बाजु असते जस की ओसामाबीन लादेन. तो का टेरिरिस्ट झाला? जन्मतः कोणी चांगल किंवा वाईट नसतं. मी तुम्हाला सांगू ईच्छिते ओसामा हे त्या पुस्तकांच नाव आहे आणि ओसामाबीन लादेनला मारल्या नतंर ते बरेच महिने न्युयार्क ला नबंर १ च बेस्ट सेलर मध्ये होत.
तिथं बसलेल्यांनी फक्त माझं ते एक वाक्य एडीट केलं आहे. आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलच कोण बसलंय हे बघून बोलायच का ? असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. समोरच्या श्रोत्यांना मला हे असं सांगायच होत लादेन हा वाईटच होता पण तो तसा का झाला हे वाचलं पाहिजे. रामायण वाचताना आपण रावणाला ही वाचतो ना? रावण होता म्हणून अख्ख रामायण घडलं नाहीतर घडलचं नसतं. जे काही हल्ली चाललंय ते खुप चुकीचं असून माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे.