ठाणे : राजकीय केंद्र बनलेल्या ठाण्यात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारी जाहीर कार्यक्रम झाला आणि त्याचा प्रभाव ठाणे जिल्ह्यात राजकीय घडामोडींवर पडला आहे. भाजपांतर्गत नाराजीतून होणारे पक्षांतर रोखण्यास नेतृत्वाला यश आले नवी मुंबईतील दोन्ही जागांचा तिढा सुटला. दुसरीकडे ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत राज्यातील भाजप नेतृत्वाला विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात योग्य तो संदेश दिल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यातील विकासाची कामे करताना ठाणे जिल्ह्याचे कायापालट करणार्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी केली. नवी मुंबईतील नैना प्रकल्प, मानपाडा ते बोरिवली भुयारी भोगदा, इस्टर्न फ्री वेचा ठाणे पर्यत विस्तार, ठाण्यात अंतर्गत मेट्रो, ठाणे महापालिकेची नवीन वास्तू यासारख्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तसेच अमरनाथमधील नवीन हॉस्पिटलच्या इमारतीचेही भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, यावरून मुख्यमंत्री शिंदे यांची किमया ठाणे जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांनी पुन्हा एकदा अनुभवली.
त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार हे निश्चित. भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी जास्तीजास्त जागा लढविण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. पंतप्रधानाच्या ठाणे दौर्यामुळे शिवसेना शिंदे गटाला झुकते माप मिळण्यास मदत होणार आहे. राज्यातील 90 जागांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला किमान 70 ते 80 जागा निश्चित मिळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या सततच्या दौर्याने महायुतीला फायदा होणार असल्याचे बोलले जात असले तरी लोकसभेतील अनुभव कटू आहे. भिवंडीतील लोकसभेच्या जागा भाजपने गमावली. त्यामध्ये स्थानिक कारणे असले तरी मोदींची सभा होऊनही लोकसभेची जागा हरल्याचे शल्य आजही भाजपच्या नेत्यांना आहे. अशा राजकीय परिस्थितीत मोदी यांच्या ठाणे दौर्याचा फायदा हा ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, ओवळा माजिवडा आणि कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातील विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील महायुतीची आजची ताकद कायम राखण्यास मदत होईल, असे चित्र निर्माण झालेले दिसून येते.