टोकावडे : कल्याण-माळशेज या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघाताची मालिका सुरु आहे. रविवारी (दि.4) रात्री साडेआठच्या सुमारास भोरांडे येथील वळणावर भीषण अपघातात तिघा तरूणांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर तिघेजण जखमी आहे. गाडीवरील नियंत्रण सुटून ती झाडावर आदळल्याने हा अपघात घडल्याची माहिती टोकावडे पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
कल्याण-मुरबाड-माळशेज 61 या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या वाहनांची वर्दळ सातत्याने सुरु असते. काल रविवार (दि.4) हा सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी जास्तच प्रमाणात वाहनांची ये-जा या रस्त्यातून सुरु असते.
रविवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास कल्याणहून भिमाशंकरकडे जाणारी इर्टिका गाडी (एम.एच.05 ई.ए.1993) भोरांडे वळणावर एका झाडाला धडकली. नरेश म्हात्रे (वय 31, रा. चिंचपाडा), अश्विन भोईर (वय 30, रा. वरप), प्रतीक चोरगे (वय 21, रा. गोवेली) अशी या आपघतात मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. तर अक्षय मोंडुले (रेवती पाडा), शिवाजी घाडगे (रेवती पाडा), वैभव कुमावत अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून या खड्ड्यांवर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांनी उन्हाळ्यामध्ये सपशेल दुर्लक्ष झाले आहे. मात्र पावसाचे प्रमाण जास्तच वाढले असल्याने खड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांमुळेच अनेकांचे मृत्यु होतात , असे बोलले तरी वावग ठरणार नाही.