

डोंबिवली (ठाणे) : कल्याण आरटीओने सोमवारी (दि.21) डोंबिवलीत फिरून स्टँडचा सर्व्हे केला. तथापी हा सर्व्हे नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप रिक्षा संघटनांकडून करण्यात आला होता. या सर्व्हेला हजर न झाल्यामुळे बुधवारी कल्याण आरटीओचे अधिकारी प्रमुख युनियनच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी डोंबिवलीत आले.
स्टँडचा सर्व्हे आणि भाड्याची निश्चिती करण्यासह शहरातील स्टँडवर प्रवासी दरपत्रकाचे बॅनर्स लावण्याच्या कारणावरून आरटीओ आणि केडीएमसीने एकमेकांकडे बोट दाखविले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आरटीओसह उपस्थित अधिकाऱ्यांबारोबर खडाजंगी झाली. परिणामी कोणताही निर्णय न झाल्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले.
कल्याण आरटीओच्या दालनात बैठक घेऊन त्या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित असतील, अशी व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले. शहरातील रिक्षा चालकांच्या चार प्रमुख संघटनांबरोबर झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार गुरूवारी आरटीओ अधिकारी अमित भंडारे आणि रोहित पवार यांच्यासह कल्याण आणि डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेच्यावतीने अधिकाऱ्यांऐवजी भूषण पाटील नावाचा शिपाई या सर्व्हेसाठी पाठविण्यात आला होता. तसेच भाजपा प्रणित डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर, लालबावटा रिक्षा चालक व मालक युनियनचे कॉम्रेड काळू कोमास्कर, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे कार्याध्यक्ष संजय मांजरेकर, डोंबिवली रिक्षा चालक व मालक युनियनचे शेखर जोशी, रिक्षा चालक/मालक संघटनेचे राजा चव्हाण, आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व्हे करण्यात आला. तथापी हा सर्व्हे देखिल दिखावू स्वरूपाचा करण्यात आल्याचा दावा भाजपा प्रणित रिक्षा चालक व मालक संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भाजपा वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी यावेळी बोलताना केला. आमच्या मागणीनुसार हा सर्व्हे पूर्णत: चुकीचा आहे. यावर आमची भूमिका आजही ठाम आहे. आम्हाला पूर्ण दिवस फिरवून आमच्या डोळ्यात प्रत्यक्ष धूळफेक करण्यात आली आहे. सदर सर्व्हे हा कल्याण आरटीओ अंतर्गत करण्यात आला. मात्र तो पूर्णत: फसवा ठरला आहे. आमच्या मागणीप्रमाणे सर्व्हे करणाऱ्यांनी मीटर लावलेली रिक्षा सोबत न ठेवता भाडेवाढीचा निर्णय घेतला नाही. मनमानी पद्धतीने फक्त रिक्षा स्टँडचा सर्व्हे केला. त्यातच आमची प्रमुख मागणी होती की, शहरांमध्ये नवीन वस्ती वाढल्यामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्याप्रमाणात स्टँडची संख्या वाढणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्व्हे करणाऱ्यांना काही स्टँड प्रस्तावित करण्याचे सुचविले. परंतु त्याच्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळेच हा सर्व्हे सर्वांच्या डोळ्यांत धूळफेक करणारा ठरल्याचा ठपका जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी ठेवला. सर्व्हे करताना प्रवाशांचा कोणताही विचार केलेला दिसून येत नाही. रिक्षाचालक आणि प्रवाशांतील वाद कमी होण्यासाठी सर्व्हे करताना स्टँडसह प्रवासी भाड्याचा देखिल त्यात अंतर्भाव असायला हवा होता. तथापी सर्व्हे करणाऱ्यांनी तसा विचार केला नाही. दरांचे फलक जागोजागी लावण्याची आमची मुख्य मागणी आहे. मात्र यावर निर्णय कोण घेणार ? यावरून आरटीओ आणि महापालिकेमध्ये द्वंद सुरू असल्याचा गौप्यस्फोट जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी यावेळी बोलताना केला. शहरातील स्टँडवर भाडे आकारणीचे दरपत्रक लावण्यासाठी लागणारा निधी आम्ही देऊ. त्या दरपत्रक बॅनर्सवर आरटीओ आणि केडीएमसीचे लोगो लावावेत, असेही आम्ही उपस्थित अधिकाऱ्यांना सुचविल्याचे दत्ता माळेकर यांनी सांगितले.
बुधवारी (दि.23) आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रवासी संघटना व रिक्षा चालक व मालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत डोंबिवलीच्या आसपास नव्याने वसलेल्या नागरी वस्त्यांचा सर्व्हे करून रिक्षाचे प्रवासी दर ठरविण्याचे ठरले. तसेच स्टेशनजवळ रिजेन्सी अनंतम् मधील रहिवाशांकरिता स्वतंत्र रिक्षा स्टँडची मागणी करण्यात आली. या बैठकीला या सर्व्हे दरम्यान रिजेन्सी अनंतम् मधील रहिवाशांसह प्रवासी संघटनेची प्रतिनिधी म्हणून हजर होते. गुरूवारी (दि.24) सकाळी आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांसह केडीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून फेरसर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच नियमानुसार शेअर रिक्षा, प्रवासी भाडे दर व मीटरप्रमाणे दर ठरविण्यात येणार आहे. जेणेकरून रिक्षाचालकाकडून अतिरिक्त भाडेदर आकारणीला आळा बसेल.