विरार : वसई-विरार परिसरातील नागरिकांना नैसर्गिक आपत्ती अथवा अपघाती दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. वसई तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्रे कमी आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांवर कामाचा ताण येतो.
वसई -विरार भागाची लोकसंख्या हि 30 लाखांच्या वर आहे, वसई विरार शहर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वसई विरार शहर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनाची सुविधा लवकरात लवकर सुरु करणे आवश्यक आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिका-यांमार्फत शवविच्छेदनाची सुविधा लवकरात लवकर सुरु करावी व केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी अशी मागणी वसई विरार शहर महापालिकेच्या माजी नगरसेविका सौ. जोस्पीन जोसेफ फरगोज यांनी वसई विरार शहर महापालिकेकडे केली होती.