पालघर : वसईमध्ये दरोडा टाकून पसार झालेल्या 5 सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेने अखेर गजाआड केले. दरोड्यातील साहित्यासह सुमारे सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हे शाखेने आरोपी अजय मंडल (37), शंकर गौडा (50), विजय सिंग (55), मोहम्मद जुबेर शेख (32) आणि लालमणी यादव (36) या 5 जणांच्या सराईत टोळीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
वसईमधील दिवाण टॉवरमधील डी के एन्टरप्राईजेस कार्यालयात 19 ऑगस्टला दुपारी सिद्धराज राजपूत (22) हे काम करत असताना पाच आरोपी आले. त्यातील एका आरोपीने डोक्याला पिस्तुल लावून ओरडला तर ठोकून टाकेल ड्राव्हरमध्ये असलेले पैसे काढ असे बोलून दुसर्याने चॉपर काढून त्याच्या मानेला लावला. सिद्धराज याचे हातपाय बांधून जीवे ठार मारण्याची धमकी देत 2 मोबाईल, रोख रक्कम, डिव्हीआर असा एकूण 73 हजार 700 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करून पळून गेले होते.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासून व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले.या टोळीकडून पोलिसांनी ऍटोमॅटिक पिस्टल, 8 जिवंत काडतुसे, इको कार, चॉपर, चाकू, कटर मशीन, हँडल बार त्याचे शॉकेट, पाने, स्क्रू ड्रॉइव्हर, पक्कड, कटर, हातोडी, चाव्या, मोबाईल व इतर साहित्य असे एकूण 3 लाख 14 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी शंकर गौडावर 10 गुन्हे, विजय सिंगवर 5 गुन्हे, अजय मंडलवर 6 गुन्हे असे तिघांवर यापूर्वीच 21 गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील, सागर साबळे, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, प्रविण कांदे, गोविंद लवटे, आनंदा गडदे, पुजा कांबळे, भालचंद्र बागुल, अमोल बर्डे आणि मोहन खंडवी यांनी केली आहे.