पावसाने उघडीप दिली असली तरी अजूनही दर्या शांत झालेला नाही. फेसाळलेल्या उंचच उंच लाटा परस्परांवर आदळत आहेत. त्यांचा होणारा आवाजही अनेकदा कानठळ्या बसणारा असतो अशा खवळलेल्या दर्यावर स्वार होण्याचे धाडस मुरूडच्या कोळी बांधवांनी दाखवत शुक्रवारी (दि.9) रोजी आपल्या मच्छीमार बोटी नव्या हंगामासाठी खोल समुद्रात लोटल्या आहेत. जिवाची पर्वा न करता समिंदराला साकडं घालत हे कोळी बांधव ताज्या म्हावर्यासाठी खोल समुद्रात मार्गस्थ झाले आहेत. आता खव्वेयांना ओढ लागली आहे ती नव्या हंगामातील मिळणार्या बोंबील, पापलेटची.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मच्छीमारीवर 1 जून ते 31 जुलै अशी दोन महिने घातलेली बंदी उठून आता आठ, दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पण खराब हवामानामुळे तसेच समुद्र खवळलेला असल्याने खबरदारी म्हणून मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळले होते. पण मच्छीमारीवर जीवन अवलंबून असलेल्या मच्छीमारांनी आता थेट खवळलेल्या समुद्रावरच स्वार होत आपल्या मच्छीमारी बोटी किनार्यावरून खोल समुद्रात मार्गस्थ केल्या आहेत. मुरूड परिसरातील शेकडो बोटी खोल समुद्रात मार्गस्थ होताना दिसत आहेत.पंधरा दिवसांची शिदोरी बरोबर घेऊन नाखवा मंडळी आपल्या अन्य सहकार्यांना सोबत घेऊन बोटी हाकताना दिसत आहेत.
येत्या सोमवारी, दि. 19 ऑगस्टला नारळी पौर्णिमा आहे. तोपर्यंत हे मच्छीमार एक, दोन फेर्या मारुन ताजी मच्छी घेऊन किनार्यावर येतील. सुरुवातीच्या काळात या मच्छीमारांना ताजी, ताजी बोंबील, पापलेट यांची आवक वाढणार आहे. मांदेलीचाही आताच सीझन असल्याने खवय्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.याशिवाय बांगडे, भिलजा या प्रमुख मच्छींचा लॉटही अनेकदा लागतो. या सर्वांची प्रतीक्षा आता खवय्यांना लागली आहे.