कासा : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव पाड्यांना मूलभूत सुविधांची वानवा जाणवत असल्याचे नेहमीच समोर आले आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य यासाठी नेहमीच आदिवासी जनतेला संघर्ष करावा लागत आहे. मागील काही महिन्यापूर्वी रस्ता नसल्याने चिखलातून मार्ग काढत विदयार्थ्यांना शाळा गाठावी लागत असताना, तालुक्यातील सोनाळे (खुबरोखपाडा) येथे स्मशानभूमी नसल्याने भरपावसात सोनाळे येथील जयराम झिरवा यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनाळे खुबरोखपाडा येथे नवीन स्मशानभूमी बाबत प्रस्ताव तयार करून मागील वर्षी पाठवला असून त्याबाबत पाठपुरावा करत आहोत.
नितेश भोईर, सरपंच महालक्ष्मी (विवळवेढे) ग्रामपंचायत
एका बाजूला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना आजपर्यंत सोनाळे खुबरोखपाडा येथील आदिवासी बांधवांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी इमारत नाही, तसेच रस्ता नसल्याने गुडघाभर पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागतो.
महालक्ष्मी ग्रामपंचायत अंतर्गत सोनाळे या महसूल गावातील खुबरोखपाडा येथे रस्ता, तसेच स्मशानभूमी नसल्याने भागात सोयी सुविधांचा अभाव असल्याने शासनांचा उडालेला बोजवारा कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.
स्मशानभूमी इमारत आणि स्मशानभूमीपर्यंत रस्ता व पूल नसल्याने कालवा उतरून नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून प्रेत घेऊन कुटुंबातील सदस्य आणि गावकरी यांना घेऊन जावे लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. बाबत महालक्ष्मी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता, सोनाळे गावात स्मशानभूमी आहेत, मात्र खूबरोखपाडा पासून अंतर लांब असल्याने तेथे नागरिक अंतविधी करण्यासाठी जात नाही. खुबरोख पाडा येथे नवीन स्मशानभूमीबाबत पुन्हा नव्याने प्रस्ताव करून स्मशानभूमी इमारती बांधणीबाबत प्रयत्न करणार आहोत असे सांगण्यात आले. दरम्यान पालघर जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात व्यक्तीच्या मृत्यूनंतरही स्मशानभूमीपर्यंतचा मार्ग सापडू नये हे दुर्दैव आहे. याबाबत लोकप्रतिनिधीतरी लक्ष देतील का? अशी आर्त हाक गावकरी घालत आहेत. पालघरच्या ग्रामीण भागात पक्के रस्ते नाहीत त्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचत नाही यामुळे पायाभूत सोयीसुविधा निर्माण होणे काळाची गरज आहे.