

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत गुरूवारी मध्यरात्री अचानक जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या आदेशांनुसार परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली मिशन कोंबिंग ऑपरेशन फत्ते करण्यात आले.
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान २५ गुंड-गुन्हेगार हाती लागले असून त्यांना तुरूंगाचा रस्ता दाखविण्यात आला आहे. दोन तासांच्या ऑपरेशन दरम्यान कल्याण-डोंबिवलीच्या लहान-मोठ्या रस्त्यांवर लावलेल्या नाकाबंदीत २६६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६६ बेशिस्त वाहन चालकांकडून ७९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कल्याण-डोंबिवली पोलिस परिमंडळात राबविण्यात आलेल्या धरपकड मोहिमेत पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्यासह ४७ वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि २१० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. गुरूवारी रात्री अकरा वाजता सुरू केलेली ही मोहीम शुक्रवारी एक वाजता संपविण्यात आली.
पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी कल्याण-डोंबिवलीच्या विविध भागात जाऊन अचानक तपासणी करून कारवाया केल्या. तंबाखुजन्य प्रतिबंधित वस्तू विक्री करणाऱ्या २६ टपरी चालकांवर कारवाई करण्यात आली. अवैध धंदे चालविणाऱ्या ९ जणांवर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ८८ समाजकंटकांना कोठडीची हवा खायला पाठवून दिले. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्या १४ बदमाशांवर कारवाई करण्यात आली. यातील २५ जणांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
विविध भागांतील बैठ्या चाळींसह झोपडपट्यांमध्ये अचानक धाडसत्र राबवून तडीपार गुंड, पोलिसांना हवे असलेले आरोपी, खतरनाक दाखलेबाज गुंडांचा शोध घेण्यात आला. कल्याण-डोंबिवलीच्या १० मुख्य प्रवेशद्वारांवर नाकेबंदी करून २६६ वाहने तपासण्यात आली. यामधील अनेक चालकांनी मद्यपान केल्याचे आढळून आले. काही जणांकडे वाहनांची कागदपत्रे नव्हती. काही जण सुसाट वेगाने वाहन चालवून जीवितास धोका निर्माण करत होते. अशा एकूण ६६ चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७९ हजाराचा दंड वसूल करण्यात आल्याचे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. अशा धरपकड मोहिमा या पुढेही दर पंधरा दिवसांनी राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील गुन्हेगारी, गैरधंदे संंपविण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात तगडा फौजफाटा लावून डीसीपी अतुल झेंडे यांनी भल्याभल्या नामचीन गुंडांच्या नांग्या ठेचून काढल्या. धरपकड मोहिमेदरम्यान हाती लागलेल्या गुंडांव्यतिरिक्त अनेक गुंडांची पळता भुई थोडी झाली होती. डीसीपी झेंडेंच्या खाक्याला घाबरून काही गुंडांनी शहराबाहेर पळ काढला. जे हाती लागले त्यांना कोठडीचा रस्ता दाखविण्यात आला. डीसीपी झेंडेंच्या आक्रमक पावित्र्यामुळे चींधीचोर गुंडांनी गुन्हेगारी सोडण्याचा निर्धार केल्याचे समजते.