ठाणे : मुंबई-ठाण्यासारख्या शहरात हरवलेल्या मुलांना शोधणे हे अवघड काम असून, काही वेळा भरकटलेली मुले वाम मार्गाला जाण्याची शक्यता असते. अशाच गेल्या सात महिन्यांत ठाणे स्थानकात भरकटलेल्या ११० मुलांना शोधून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दरम्यान शहरात हरवलेल्या या मुलांना वाईट संगत लागणार नाही, याची खबरदारी घेऊन, ठाणे स्थानकात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ठाणे रेल्वे चाईल्ड लाईन, टीसी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, यांच्या सतर्कतेने केले जात आहे. ठाणे स्थानकात दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढत आहे. (The work of reaching the children to their relatives is being done under the vigilance of Thane Railway Child Line, TC RPF, Lohmarg Police.)
दिवसभरात साडेसात लाख प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या ठाणे स्थानकात काही वेळा मोठी व्यक्ती हरवते. अशातच लहान मूल स्थानकात गोंधळून जातात. कुठे जायचे काय करायचे पटकन समजत नाही. त्यामुळे स्थानकात हरवलेल्या मुलांचे भविष्य देखील धोक्याचे ठरू शकते. गर्दुल्ले, मद्यपर्णीबरोबर वाईट काम करून घेण्यासाठी लोक, या मुलांचा उपयोग करतात. मात्र रेल्वे, जिल्हा महिला व बालविकास विभाग ठाणे (ठाणे रेल्वे चाईल्ड लाईन), टीसी, रेल्वे कर्मचारी, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस हरवलेल्या मुलांवर लक्ष ठेवून आहेत. जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्यात ११० मुलांना त्यांच्या घरी सोडले आहे.
उत्तर प्रदेश, नेपाळ, राजस्थान, हैदराबाद, आदी भागातून मुले ठाणे स्थानकात एकटे फिरताना दिसतात. येण्याची कारणे भरपूर आहेत. यापैकी कोणी नोकरीसाठी, सिनेमांत काम करण्यासाठी, घरात भांडून ही मुले येतात. मात्र वाईट मार्गाला जाणार नाही याची काळजी चाईल्ड लाईन हेल्प डेक्स घेत आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांच्या सहकायनि शोधलेल्या मुलांसाठी एक समिती गठीत केली आहे. या समिती मध्ये रेल्वे, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, चाईल्ड लाईन हेल्प डेक्स कर्मचारी आहेत.
शासनाच्या जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज असते, अशा बालकांसाठी ठाणे रेल्वे चाईल्ड लाईन काम करत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात भरकटलेल्या मुलांना मदत देण्यासाठी २०१९ मध्ये कक्ष स्थापन झाला आहे. हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चाईल्ड लाईन हेल्प डेक्सची मोठी मदत मिळत आहे. पुढे शोधलेल्या मुलांना बाल कल्याण समितीमार्फत मुलांनी सांगितलेल्या पत्त्यावर किंवा बालगृहात ठेवले जात असल्याचे चाईल्ड लाईन हेल्प डेक्सच्या ठाणे जिल्हा समन्वयक श्रद्धा नारकर यांनी सांगितले.