ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला. त्यामुळे आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.13) वर्तक नगर पोलीस पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. केवळ आव्हाड यांचीच सुरक्षा वाढवण्यात येऊ नये तर त्यांच्या घराबाहेर देखील सुरक्षा वाढवावी अशी मागणी पोलीस आयुक्तांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
अजित पवार गटातील माजी आमदर बाबा सिद्धकी यांच्या हत्येची जवाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारल्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून वर्तक नगर पोलिसांना जितेंद्र आव्हाड यांना सुरक्षा वाढवण्याचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रात आमदार जितेंद्र आव्हाड यांना एप्रिल महिन्यात बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आला होता. हा फोन खंडणीसाठी करण्यात आला होता. जर खंडणी दिली नाही तर कफनची व्यवस्था करावी, असेही फोन करणार्या व्यक्तीने तेव्हा धमकावले होते.ऐन लोकसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड ठाण्यातील घरी असताना अनोळखी नंबरवरून एक फोन आला. त्यात फोन करणार्या व्यक्तीने स्वतःला बिष्णोई गँगचा शार्पशूटर असल्याचा दावा केला होता.
फोनवर बोलतांना आपले नाव रोहित गोदारा असे सांगत आपण हा फोन ऑस्ट्रेलियातून करीत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, माजी आमदार बाबा सिद्धकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.