

डोंबिवली : कृषी विभाग आत्मा, कृषी पणन पुरस्कृत डोंबिवलीकर प्रतिष्ठानने संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. शेतात पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थींशिवाय स्वस्त दरामध्ये थेट ग्राहकापर्यंत पोहचावा आणि शेतकऱ्यांना त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बाजारपेठेचा शुभारंभ डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (दि.6) करण्यात आला.
कृषी विभाग आत्मा आणि कृषी पणन पुरस्कृत आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने थेट शेतकरी ते ग्राहक अशी ती संकल्पना आहे. नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदानात ही ग्राहक पेठ सुरू राहणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी (दि.6) ही ग्राहक पेठ डोंबिवलीतील वेगवेगळ्या मैदानांवर आयोजित केली जाणार आहे.
सर्वांचे पोट भरावे यासाठी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या आपल्या अन्नदात्या शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळाले, तसेच शहरवासियांना थेट शेतातील माल खरेदी करता आला तर त्यात दोघांचाही फायदा असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या संकल्पनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या बाजारपेठेत डोंबिवलीकरांना सेंद्रिय, तसेच नैसर्गिक पद्धतीचा सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, आदी जिन्नस रास्त दरात विकत घेता येणार आहेत. नेहरू मैदानात नवरात्रीनिमित्त विशेष फ्रुट महोत्सवाच्या रूपाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास सुरूवात झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी ठाणे जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी, माजी नगरसेवक राहूल दामले, खुशबू चौधरी, संदीप पुराणिक, भाजपाचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजपाच्या वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर, दिनेश दुबे यांच्यासह डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.